शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई :
राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्याने गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
स्थानिक परिस्थिती नुसार बालवाडी ते बारावी असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. याचे निर्णयाचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असतील, पालकांची समंती आवश्यक असून त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं सांगितलं आहे.
ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावात येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा विचार करावा असं सांगण्यात आलं आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. बालवाडी ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे, मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे.
शाळेत जाऊन १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करता येईल का हे आम्ही पाहत आहोत , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असावेत असं स्पष्ट केलं आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून करोनाची स्थिती चिंताजनक नसल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वच स्तरांतून शाळा सुरू करण्याबाबत मागणी होऊ लागली होती. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळा- महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी संमती दिली आहे. महत्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्तांवर मुख्य जबाबदारी असेल.