राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला :
राज्यात सौर ऊर्जा पार्कची उभारणी केली जाणार
मुंबई :
राज्य सरकारने विजे बाबत मोठा निर्णय घेतला
राज्यात सौर ऊर्जा पार्कची उभारणी केली जाणार आहे. राज्यात विजेच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून त्यामुळे राज्याला अतिरिक्त २५०० मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्यात सौर ऊर्जा पार्कची उभारणी केली जाणार आहे.
महानिर्मिती अर्थात महाजेनको कंपनी एनटीपीसी लिमिटेडसोबत संयुक्तपणे कंपनी स्थापन करून त्यामार्फत हे सौर ऊर्जा पार्क उभारलं जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
या दोन्ही कंपन्यांमध्ये प्रत्येकी ५० टक्के भांडवली गुंतवणूक भागीदारीवर ही संयुक्त कंपनी स्थापन केली जाईल. त्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागास राज्य सुकाणू अभिकरण (State Nodal Agency) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
राज्य सुकाणू अभिकरण समितीवर राज्य शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणाशी सुसंगत अशा बाबींचे पालन करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सौर ऊर्जा पार्कमधील प्रकल्पधारकाकडून एक रकमी शुल्क व वार्षिक संचलन व देखभाल शुल्क इ. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुज्ञेय करण्यात आले आहे
अपारंपरिक ऊर्जेसाठी १७३६० मेगावॅट क्षमतेच्या निर्मितीचे प्रकल्प २१ मार्च २०२५ पर्यंत विकसित करण्यात येणार असून यापैकी १२९३० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यात सध्या ९३०५ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित असून २१२३ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहेत.