घरोघरी रंगविरहीत शाडू मातीच्या गणेशमूर्ती बसवणारे गाव : सोनाळी गावची ७६ वर्षांची पर्यावरणपूरक परंपरा
कोल्हापूर :
सुमारे ७६ वर्षांपासून ग्रामस्थ व तरुणांकडून घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी रंगविरहीत शाडू मातीच्या गणेश मूर्ती बसवून पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी साजरा करण्याची परंपरा करवीर तालुक्यातील सोनाळी गावाने आजही कायम जपली आहे. गणेशोत्सवातून पर्यावरण जागृतीचा संदेश देणाऱ्या या गावच्या ग्रामस्थ व तरुण मंडळांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
गणेश चतुर्थी उत्सवात सर्वच गावात रंगीत मूर्ती बसविल्या जातात. हळूहळू रंगीत आणि प्लॅस्टरच्या मूर्तीपासून होणारे जलप्रदूषण , पर्यावरण प्रदूषण यामुळे जनजागृती होऊ लागली. सामाजिक, पर्यावरण प्रेमी संस्था व शासन स्तरावरूनही
जनजागृतीचा प्रयत्न सुरू झाला. त्यातूनच पुढे विसर्जनप्रसंगी मूर्ती दान व निर्माल्य संकलन या संकल्पना आल्या आणि त्या गावागावात रुजत लागल्या. मात्र सोनाळी गावाने गेल्या ७६ वर्षांपासून रंगविरहीत शाडू मातीच्या गणेश मूर्ती बसवून आपल्या प्रत्यक्ष कृतीतून अखंडितपणे हा उपक्रम राबवून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.
धाकेश्वर हे ग्रामदैवत असलेल्या सोनाळी गावची लोकसंख्या सुमारे १६५० -१७०० चे आसपास आहे. तुळशी खोऱ्यातील या छोट्याशा गावात ३०० कुटुंबे आहेत. शेती व पशुपालन हा येथील मुख्य व्यवसाय.
गावात आजही घरोघरी रंगविरहित शाडू मातीच्या मूर्ती बसविल्या जातात. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी तरुण मंडळांकडून मोठं – मोठ्या, आकर्षक मूर्त्या बसविण्यासाठीची ईर्षा , चढाओढ आपण पाहतो. पण या छोट्या गावातील धाकेश्वर आणि जय शिवराय या दोन तरुण मंडळांनीही स्थापनेपासून रंगविरहित शाडू मातीच्या मूर्ती बसवून गावची परंपरा कायम राखली आहे.
————
गावामध्ये साधारणतः गेल्या ७६ वर्षांपासून गणेश चतुर्थीनिमित्त रंगविरहीत शाडू मातीची मूर्ती बसविण्याची उल्लेखनीय परंपरा चालू आहे. वाढत्या प्रदूषणाचे धोके लक्षात घेता अन्य गावांसाठीही हा उपक्रम अनुकरणीय असाच आहे. ग्रामस्थ व तरुण मंडळांच्या सहकार्याने हा उपक्रम यापुढेही कायम चालू राहील.
– मोहन पाटील, माजी सरपंच सोनाळी
————