सूर्यफूल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी :
आणखी पंधरा दिवस सूर्यफूल बियाणे उपलब्ध होणार नाही
कोल्हापूर :
सूर्यफुलाचे बियाणे तयार करणाऱ्या तीन कंपन्या असून अवकाळी पावसाने प्लॉट फेल गेल्यामुळे यंदा सूर्यफूल बियाण्याचा तुटवडा आहे. जिल्ह्यात आणखी पंधरा दिवस सूर्यफूल बियाणे उपलब्ध होणार नाही, अशी माहिती कृषी खात्यातील शासकीय सूत्रांनी दिली. यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी सूर्यफूल करणाऱ्या शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळी हंगाम कालावधी पुढे जाणार असून शेतकऱ्यांनी सूर्यफूल बियाणाला पर्यायी पीक घ्यावे लागणार आहे. दरम्यान यापुढे सूर्यफूल पीक घेता आले नाही तर सूर्यफूल तेलाचे दर वाढतील असे चित्र आहे.
जानेवारीपासून उन्हाळी हंगामाची सुरुवात झाली आहे. मात्र दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सूर्यफूल बियाणाचा तुटवडा आहे, जिल्ह्यात सुमारे शंभर हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी होईल असा अंदाज असून यासाठी ७० क्विंटल बियाणाची मागणी असताना एक किलो ही बियाणे उपलब्ध झालेले नाही. एकीकडे खाद्य तेलाचे दर भरमसाठ वाढत आहेत ,दुसरीकडे तेलबियाणे उपलब्ध होत नाहीत, यामुळे शेतकऱ्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन चार वर्षापूर्वी बोगस सूर्यफूल बियाणांमुळे अनेक शेतकर्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. यानंतर जिल्ह्यात सूर्यफुलाचे क्षेत्र घटले आहे ,मात्र आता खाद्य तेलाचे दर भरमसाठ वाढत आहेत,
सूर्यफूल तेलाचा दर २०० रुपये किलो च्या वरती गेला आहे, त्यामुळे शेतकरी नव्याने सूर्यफूल , व भुईमूग पीक घेण्यावर भर देत आहे.
जिल्ह्यात रब्बी, उन्हाळी आणि खरीप मधेही काही शेतकरी सूर्यफूल पीक घेतात. रब्बी हंगामात सुमारे ६० हेक्टर तर उन्हाळी हंगामात सुमारे शंभर हेक्टर सूर्यफूल पीक घेतले जाते. यासाठी सुमारे ७० क्विंटल बियाण्याची मागणी होत असते. पन्हाळा, शाहूवाडी, करवीर आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर सुर्यफूल बियाण्याची मागणी होत आहे. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे सूर्यफुलाचे प्लॉट फेल गेले ,यामुळे बियाणाचा तुटवडा आहे अशी खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली.आता
उन्हाळी हंगामात बियाणे उपलब्ध न झाल्यास हंगाम वाया जाण्याची भीती आहे. सध्या सर्वत्र उसाचे खोडवे व काढण्यात येणारे उसाचे पीकाच्या तोडण्या सुरू आहेत, यामुळे बियाणाची मागणी होत आहे. जिल्हा कृषी खात्यातील शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी कंपन्या बियाणे तयार करतात ,मात्र बियाणे प्लॉट फेल गेल्यामुळे आणखी पंधरा दिवस राज्यभर बियाने उपलब्ध होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सूर्यफूल पिकासाठी ठेवलेले क्षेत्र इतर पिकाखाली घ्यावे लागणार आहे.
ज्ञानदेव वाकुरे ,जिल्हा कृषी अधीक्षक,
तीन खासगी कंपनी बियाणे तयार करतात, अतिवृष्टीमुळे प्लॉट गेले तर राज्यभरात यापुढे पंधरा दिवस बियाणे उपलब्ध होणार नाही.