अध्यक्ष एकनाथ पाटील यांची माहिती
करवीर :
कुडित्रे ता.करवीर येथील श्री यशवंत सहकारी बँकेची राष्ट्रीय पातळीवरील बँको पुरस्कारांची निवड झाली. ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगिरी मधून बँको ब्ल्यू रिबन २०२० सालाकरिता ही निवड झाली.अशी माहिती बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले ग्रामीण कार्य क्षेत्र असणाऱ्या व सर्वसामान्यांची एक कुटुंब एक बँक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आपले श्री यशवंत सहकारी बँकेस, ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगिरी मधून बँको ब्ल्यू रिबन २०२० या पुरस्कारासाठी बँकेची निवड झाली आहे. पुरस्कार ही बाब अभिमानाची असून याचे सर्व श्रेय बँकेचे सभासद, खातेदार, हितचिंतक, व कर्मचारी यांना जाते.
बँकेने अल्पावधीतच २०० कोटी व्यवसायाकडे गरुड झेप घेतली आहे. रिझर्व बँकेचे सक्षम तेचे सर्व निकष पूर्ण केले असून,बँकिंग क्षेत्रात वाढती स्पर्धा असतानाही ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेने स्वतःचे डाटा सेंटर सह, सर्व ग्राहकांना एटीएम, एनईएफटी, आरटीजीएस ,फास्टॅग, डिजिटल सेवा दिलेल्या आहेत.अल्पावधितच मोबाईल बँकिंग सेवा कार्यान्वित होत असून सर्व ग्राहकांनी आपले व्यवहार बँकेमार्फत करावेत असे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी केले.
बँकेच्या ठेवी १२० कोटी ६२ लाख, कर्जे ७९ कोटी ६७ लाख, भागभांडवल चार कोटी ९४ लाख, एकूण व्यवसाय २०० कोटी २९ लाख झाला आहे. २०१७ मध्ये १२० कोटी चा व्यवसाय होता, नंतर या नवीन संचालक मंडळाने चार वर्षात ८० कोटीचा व्यवसाय वाढवून २०० कोटीचा टप्पा गाठला आहे. सलग दहा वर्षे बँकेचा एनपीए शून्य टक्के आहे. बँकेच्या १० शाखा कार्यरत असून राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीने आधुनिक सुविधा बँकेच्या वतीने पुरवल्या जात आहेत.
शेतकरी केंद्रबिंदू मानून ग्रामीण भागात काम करणाऱ्या सहकारी बँका टिकल्या पाहिजेत, अशी भूमिका यावेळी अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब कांबळे, संचालक यशवंत शेलार, नामदेव मोळे ,संग्राम भापकर ,दादूमामा कामीरे,प्रा. टी. एल. पाटील, सुभाष पाटील, उत्तम पाटील , एस. के. पाटील,पांडुरंग पाटील, संभाजी नंदीवाले, संचालक उपस्थित होते.