रत्नागिरी :
गुरुवारची पहाट कोकणासाठी काळी पहाट ठरली. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने कोकणातील जनजीवन कोलमडून गेलं. मुंबईनंतर पावसानं कोकणात धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये एका रात्रीत होत्याचं नव्हतं. वशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने कहर केला. रायगड जिल्ह्यातील कर्जत व महाड हा परिसरही जलमय झाला असून, पुराने वेढा दिलेल्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक घेत प्रशासनाला तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेशही दिले. दरम्यान रायगडमध्ये बापलेक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मुंबईनंतर पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे मोर्चा वळवला. हवामान विभागाने व्यक्त केलेला अतिवृष्टीचा अंदाज खरा ठरवत पावसाने रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर व ठाणे, पालघर जिल्ह्यात धुमाकूळ घातला. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी व गगनबावडा अनेक तालुक्यातील परिसर जलमय झाला. कोल्हापुरातही परिस्थिती निर्माण झालेली असताना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराची तर नाकातोंडात पाणी गेल्यासारखीच अवस्था झाली. त्याचबरोबर खेडमध्येही पावसाचं रौद्ररुप बघायला मिळालं. दिवसभर संततधार पाऊस असल्यानं चिपळूण शहर पाण्यात भरलं. तर खेडमध्येही अशीच काहीशी स्थिती होती. तिकडे रायगड जिल्ह्यातील कर्जत व महाड तालुक्यातील अनेक भागात पाणी शिरलं.
कोल्हापूरसह कोकणात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन सूचना दिल्या. त्याचबरोबर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही हाती घेण्यात आलेल्या मदतकार्याची माहिती दिली. “आज सकाळी एनडीआरएफच्या दोन टीम पोहोचल्या आहेत. कोस्ट गार्डच्या टीमही पोहोचल्या आहेत. सर्व तैनात असलेल्या यंत्रणा सध्या युध्दपातळीवर काम करत आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे. रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या प्रत्येकी दोन अशी एकूण चार पथके रवाना झाली. तर ठाणे येथे तीन व पालघर येथे एक टीम पोहचली आहे”, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
“एअरलिफ्ट करण्यासाठीही मदत मागितली आहे. खेड आणि चिपळूणचे दोन्ही रस्ते बंद झाल्यामुळे संपर्क तुटला आहे. मुख्यमंत्री स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. निसर्गापुढे मर्यादा असतात, मदत पोहोचवण्यातही मर्यादा येत आहेत; पण आम्ही मदत पोहोचवत आहोत”, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.