पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारची मंजुरी
मुंबई :
पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सरकारने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून, पोलीस भरतीसाठी प्रथम शारीरिक चाचणी होणार आहे.
मैदानी चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाईल. पोलीस शिपाईपदासाठी एकूण ५० गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी १६०० मीटर धावणे (२० गुण), १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण, तर महिला उमेदवार ८०० मीटर धावणे (२० गुण), १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची होणार आहे.
यामध्ये पुरुष उमेदवारासाठी ५ किलोमीटर धावणे (५०गुण), १०० मीटर धावणे (२५गुण), गोळाफेक (२५ गुण) असे एकूण १०० गुण असणार आहेत.
शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील. लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयावर आधारित प्रश्न असतील. या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र ठरतील.
प्रत्येक पोलीस घटकासाठी नेमलेले निवड मंडळ शारीरिक व लेखीमध्ये मिळवलेल्या गुणांचे एकत्रीकरण करून पोलीस महासंचालक कार्यालय अंतिम गुणवत्ता यादी तयार करेल,
पूर्वी लेखी परीक्षा आधी आणि शारीरिक चाचणी नंतर होत होती़ मात्र, आता शारीरिक चाचणी आधी घेण्यात येणार असून, तिथे पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच लेखी परीक्षा होणार आह़े या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलीस दलास होणार असून, त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.