उत्तर महाराष्ट्राला पावसाने झोडपले :
मराठवाडय़ात १२ जणांचा मृत्यू
Tim Global :
मराठवाडय़ात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने आलेल्या पुरात विविध जिल्ह्य़ांत पुरात १२ जण वाहून गेले. अतिवृष्टीमुळे या भागांत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात नांदगाव,चाळीसगाव आणि धुळे जिल्ह्य़ातील अनेक भाग बुधवारी पाण्याखाली होते.उत्तर महाराष्ट्राला पावसाने झोडपले आहे .
खान्देशातील पांझरा, तापी, गिरणा, वाघूर नदीला पूर आला आहे.मराठवाडय़ात मंगळवारी रात्री पावसाने तांडव घातले. नदी- नाल्यांना पूर आले. रात्रीतून पुलावरुन पाणी वाहू लागल्याने वाहने पुरात वाहून गेली.
औरंगाबाद शहरात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद शहरासह नांदेड, बीडसह मराठवाडय़ातील ४२१ मंडळापैकी १२० मंडळात अतिवृष्टी नोंदविण्यात आली. मराठवाडय़ातील पिकांचे मोठे नुकसान झाले.
मराठवाडय़ात जायकवाडी धरणाच्या खालच्या बाजूस गोदावरीचे पात्र दुधडी भरुन वाहत असून सिंदफणा, मांजरा, कयाधू या नद्यांची पातळी वाढत आहे. दरम्यान पोच्चमपाड धरणातील पाणीसाठा वाढत गेल्यास आणि नांदेडमध्ये पुन्हा पाऊस झाल्यास परिस्थिती हाताळता यावी अशी व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये कोकण विभागात सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला. संगमेश्वरमध्ये २९० मि.मी., गुहागर २४०, दापोली १५० मि.मी., तर बेलापूर (ठाणे), मुरूड, श्रीवर्धनमध्ये १२० मि.मी. पावसाची नोंद झाली.
कोकण विभागात काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि राज्यावरील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यात तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. गुरुवारपासून (९ सप्टेंबर) तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.