शेतकऱ्यांना दिलासा
करवीर :
काटेभोगाव (ता. पन्हाळा ) येथील पाझर तलावाच्या दगडी पिचिंगचे काम नव्याने करून घेण्यात येणार आहे .अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिली .करवीर विधानसभा मतदार संघाचे आमदार पी एन पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता .
काटेभोगाव गावापासून नदीचे पात्र खूप अंतरावर आहे .यामुळे सिंचनाअभावी कोरडवाहू शेती अडचणीत होती .पावसाळा संपल्यानंतर रब्बी पिके व जनावरांना पाण्याची सोय असावी म्हणून १९७२ मध्ये रोजगार हमी योजनेतून गावाच्या दक्षिणेला पाझर तलाव बांधण्यात आला होता . पण या पाझर तलावाला मोठी गळती असल्याने त्याच्यात पाणीसाठवण होत नव्हती . हा तलाव मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग केल्याने, डागडुजीसाठी ५६ लाख ६७ हजार निधी मंजूर करण्यात आला . यानंतर भरावा वरील झाडे काढून साफसफाई करण्यात आली व पाया खुदाई करून कामाला सुरुवात करण्यात आली होती .तलावाच्या दगडी पीचींग चे काम प्रगतीपथावर असतानाच जून महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे दगड व मुरूम तलावात घसरले होते.
यामुळे तलावास धोका निर्माण झाला होता.तलावाच्या खाली असणारी शेकडो एकर शेती धोक्यात आली होती .
विधिमंडळात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी या प्रश्नाबाबत खुलासा करताना सद्यपरिस्थिती अंशतः खरी असून अश्मपाटलाचे काम प्रगतिपथावर असताना चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक तलाव क्षेत्रावर अतिवृष्टी झाली .त्यामुळे प्रगतीवर असलेले दगड व मुरूम पाण्यामध्ये खाली घसरला आहे . पाणी साठा पूर्ण क्षमतेने झाल्यामुळे काम थांबले होते.त्यामुळे शासनाच्या निधीचा कोणताही अपव्यय झालेला नसून अचानक आलेल्या चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे ही घटना घडली होती .तसेच निविदेमधील काम अद्याप पूर्ण झालेले नाही .त्यामुळे तलावातील पाणी पातळी कमी झाल्यावर तलावांमध्ये घसरलेला मुरूम व दगड काढून नव्याने दगडी पिचिंगचे काम चांगल्या प्रकारे करून घेण्यात येणार असल्याची माहिती सभागृहाला दिली .
आमदार पी एन पाटील यांनी पाझर तलाव बाबत विधिमंडळात आवाज उठवल्याने जलसंधारण मंत्र्यानी तलावाच्या दुरुस्तीच्या बाबत दिलेल्या आश्वासनामुळे काटेभोगावच्या शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे .