आर्थिक अडचणीतील कारखाना सक्षमपणे चालविला : अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील
(कुरुकली येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा : बिनविरोधसाठी कोणाचेही वावडे नसल्याचे केले स्पष्ट )
कोल्हापूर :
कोणत्याही प्रकारची उपपदार्थ निर्मिती नसतानाही आर्थिक अडचणीतील भोगावती सहकारी साखर कारखाना सक्षमपणे चालवला आहे . काटकसर व पारदर्शक कारभार करत तारेवरील कसरत केली असून ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचे काम प्रामाणिकपणे केले आहे . भोगावती कारखाना सुरळीतपणे मार्गावर आणण्यासाठी आगामी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्हाला कोणाचेही वावडे नाही, असे प्रतिपादन भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांनी केले .
कुरुकली ता करवीर येथे भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आम. पाटील बोलत होते . मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पांडूरंग रघुनाथ पाटील हे होते . यावेळी कारखाना चांगला चालवल्या बद्दल आ . पाटील यांचा तसेच विविध गुणवंतां चा सत्कार करण्यात आला .
आमदार पाटील पुढे म्हणाले, डिस्टलरीसह इथेनॉल प्रकल्पही सुरु करणार असून कारखाना लवकरच कर्जमुक्त होणार आहे. त्यामुळे सभासदांनी अपप्रचारा ला बळी पडू नये. सहा वर्षापुर्वी आर्थिक अडचणी तील कारखाना काटकसर करत चालवला आहे मी स्वतः कोणताही भत्ता अथवा प्रवास खर्च घेतलेला नाही . जिल्हा बँकेच्या कर्जावर १४ टक्के व्याज आकारणी होत होती . बँकेचे अध्यक्ष ना हसन मुश्रीफ यांच्या कडे आग्रह धरून व्याजदर ११ टक्के करण्यास भाग पाडले यामुळे दरवर्षी कारखान्याची ११ कोटी रुपयांची बचत झाली आहे.
विरोधकांनी डिस्टलरी चालवायला दिली . चार कोटीची जुनी मिल केवळ ९० लाख रुपयांना विकली असा कारभार आम्ही कधी केला नाही असे सांगून दरवर्षी पुर्वहंगामी खरेदीत तीस ते चाळीस टक्के बचत केली . दरवर्षी ऊसबिले दिली असून कर्मचाऱ्यांना दोन वेळा वेतन करार लागू केला आहे .जुन्या सत्ताधाऱ्यांनी खाजगी मालकाकडे चालवण्यास दिलेली डिस्टलरी कारखान्याच्या ताब्यात घेतली असून त्यातून उत्पादन सुरु केले जाणार आहे . त्याचबरोबर इथेनॉल प्रकल्प सुरु केला जाणार आहे . त्यामुळे आगामी काळात कारखाना निश्चितच कर्जमुक्त करू असा ठाम विश्वासही आमदार पाटील यांनी दिला.
यावेळी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर व संचालक प्रा.शिवाजीराव पाटील यांनी गेल्या सहा वर्षात कारखान्याचा कारभार सभासद व कर्मचारी हिताचाच केला असून विरोधक खोटे नाटे आरोप करून सभासदांची दिशाभुल करत आहेत . या अपप्रचाराला सभासदांनी बळी पडू नये असे सांगितले . स्वागत संचालक प्रा. सुनिल खराडे यांनी केले .
मेळाव्याला जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, संदीप पाटील, साताप्पा पाटील धामोडकर बाळासाहेब कारंडे, माजी संचालक वसंतराव पाटील, शिवाजीराव तळेकर, शंकरराव पाटील, बबन रानगे, सरपंच रोहित पाटील, मनोज पाटील, नामदेव गोपाळा पाटील, विजय भोसले आदींसह आजी माजी संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . आभार संचालक पांडूरंग पाटील यांनी मानले .
————-
निवडणूक रिंगणात नसलो तरी भोगावतीच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे उभा…
१९८९ पासून भोगावती साखर कारखान्याचे नेतृत्व केले असून गेल्या सहा वर्षात कारखाना मार्गावर आणण्यासाठी जिवाचे रान केले आहे . त्यामुळे मी निवडणूक रिंगणात नसलो तरी भोगावती चे सभासद व कामगारांच्या हितासाठी मी भोगावती च्या पाठीशी हिमालया प्रमाणे उभा आहे, असे ठाम आश्वासन आमदार पी.एन.पाटील यांनी दिले .