कोल्हापूर :
दि. 21 जून ते 1 जुलै या कालावधीत कृषि संजीवनी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले.
खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषिमित्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. कृषी तंत्रज्ञानातील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते. त्याअनुषंगाने दि. 21 जून ते 1 जुलै या कालावधीत प्रत्येक कार्यालयीन दिवशी खालीप्रमाणे महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन कृषी संजीवनी मोहीम साजरी करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातून एकाच दिवशी एकाच मोहिमेची प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
दर दिवशी होणाऱ्या विस्तार कार्यक्रमाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
21 जून -बीबीएफ लागवड तंत्रज्ञान (रूंद वरंबा सरी तंत्रज्ञान), 22 जून – बीजप्रक्रिया तंत्रज्ञान, 23 जून -जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलीत वापर, 24 जून – एक गाव वाण/ सुधारित भात लागवड तंत्रज्ञान/ ऊस लागवड तंत्रज्ञान/ कडधान्य व तेलबिया आंतरपीक तंत्रज्ञान, 25 जून- विकेल ते पिकेल अंतर्गत पिक उत्पादन व विक्री व्यवस्था, 28 जून -महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, 29 जून – तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, 30 जून- किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना व 1 जुलै -कृषी दिन आणि मोहिमेचा समारोप कार्यक्रम.