मोठा बातमी : पंतप्रधान मोदींची घोषणा : तिन्ही कृषी कायदे रद्द : शेतकरी आंदोलनाचे यश
दिल्ली :
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला आता मोठं यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. त्यानंतर यावेळी त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहनही केले.
देशातील शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता. मंथन चर्चा करुन हे कायदे आणले.
देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव, त्रुटी राहिली असेल. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं मोदींनी जाहीर केलं.
मोदी पुढे म्हणाले, संसदेत चर्चा केली. मात्र काही शेतकऱ्यांचा, एका समूहाचा या कायद्यांना विरोध होता. आम्ही विविध मार्गानं त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. संवाद सुरू ठेवला. त्यांचे आक्षेप समजून घेतले. ते बदलण्याची तयारी दर्शवली. दोन वर्षे कायदे रद्द करण्याचा प्रस्तावदेखील दिला. मात्र त्यांचा विरोध कायम राहिला.
त्यामुळेच आम्ही त्या शेतकऱ्यांची समजूत घालण्यात कमी पडलो, असं मला वाटतं. त्यामुळेच तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायद्याबाबत ही मोठी घोषणा केल्यामुळे शेतकरी वर्गात , शेतकरी आंदोलन कर्त्यात समाधान व्यक्त होत आहे.