जिल्हाधिकाऱ्यांचे देवस्थान व्यवस्थापन समितीला पत्र
कोल्हापूर :
कोविड-19 प्रादूर्भावाच्या अनुषंगाने श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे श्री. जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी/पुजारी व भाविक यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात येत आहे. असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अवर सचिव तथा सचिवांना आज पाठविले आहे.
दरवर्षी श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे होणाऱ्या श्री जोतिबा खेटे कार्यक्रमावेळी भाविकांची/नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मंदिर व परिसरात होत असते. यावर्षी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी पासून पुढील चार रविवारी श्री जोतिबा खेटे कार्यक्रमावेळी भाविकांची/नागरिकांची क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 29 जानेवारी 2021 रोजीच्या आदेशान्वये जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक 28 फेब्रुवारी रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणारे मेळावे कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे राज्यातील कोविड रुग्ण संख्या पुन्हा वाढत असल्याने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याबाबत निर्देश देवून त्यांची कडक अंमलबजावणी करण्याबाबत सुचित केले आहे. त्या अनुषंगाने यात्रा, उत्सव, ऊरुस, इ. चे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
श्री. क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे दि. 28 फेब्रुवारी रोजी पासून पुढील चार रविवार संपन्न होणारे श्री जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु, पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी/पुजारी व भाविक यांच्या उपस्थिती पुजा करण्यास परवानगी देण्यात येत आहे. तथापि, श्री जोतिबा खेटे कार्यक्रमास भाविकांना व नागरिकांना प्रवेश देण्यात येवू नये, असे यात म्हटले आहे.