गोकुळने दूग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविले : अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई
कोल्हापूरःता.१८.
ग्रामीण भागाचा सहकारामुळे विकास झाला असून या विकासामध्ये गोकुळ दूध संघाचा मोलाचा वाटा आहे. दूग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम गोकुळने केले असून गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्यांच्या विकासाचा पाया आहे. असे प्रतिपादन कोल्हापूरच्या अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई यांनी ७० व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्त आयोजित मेळाव्यामध्ये केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि महिलांचे जीवनमान हे कष्टमय असून महिलांनी विविध योजनांच्या व बचतगटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय उभे करावेत तसेच युवापिढी ही भारताचे भविष्य असून ती व्यवसायाभिमुख झाली तरच देशाचा विकास होईल यासाठी युवक-युवती यांना चांगले संस्कार, शिक्षण देणे व योग्य मार्गदर्शन करणे ही पालकांची महत्वाची जबाबदारी आहे.असे याप्रसंगी मार्गदर्शन केले.
दरवर्षीप्रमाणे गोकुळ दूध संघातर्फे ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात सहकार सप्ताह निमित्त व्याख्यान आयोजित करणेत आले होते. या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संघाचे संचालक मंडळ यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले व आभार संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी मानले तसेच सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, संभाजी पाटील, कर्णसिंह गायकवाड, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, जिल्हा सहकार विकास अधिकारी बी.जी.साळोखे, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुरंबेकर, पशुसंवर्धन डॉ. यु.व्ही.मोगले, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ. व्ही.डी.पाटील, महिला नेतृत्व विकास अधिकारी निता कामत तसेच संघाचे अधिकारी, कर्मचारी व महिला स्वयंसेविका उपस्थित होत्या.