पुणे :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रतिक्षा असलेला बोर्डाचा निकाल जाहीर झाल्याने अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे. पुणे येथे पत्रकार परिषदेत शिक्षण मंडळाने दहावीचा एकूण निकाल ९९.९५ टक्के लागला असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान निकालात कोकणाने बाजी मारली असून १०० टक्के निकाल लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून दहावीच्या २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
दहावीचा निकाल ९९.९५ टक्के….
अध्यक्ष दिनकर पाटील यांनी यावेळी एकूण ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले असल्याची माहिती दिली आहे. तर ८३ हजार ९६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
कोकणाची बाजी….
राज्याच्या दहावीच्या परिक्षेत कोकण विभागाने बाजी मारली आहे. विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. ३१ हजार १६८ विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे विभागाचा निकाल १०० टक्के लागले आहे. सर्वात कमी निकाल नागपूरचा (९९.८४)लागला आहे.
पुणे ९९.९६
नागपूर ९९.८४
औरंगाबाद ९९.९६
मुंबई ९९.९६
कोल्हापूर ९९.९२
अमरावती ९९.९८
नाशिक ९९.९६
लातूर ९९.९६
कोकण १००
२२ हजार ३८४ शाळांचा १०० टक्के निकाल
राज्यातील २२ हजार ७६७ शाळांमधून १६ लाख ५८ हजार १६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर राज्यातील नऊ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.