साधा संधी : थेट अभिकर्ता पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर :
कोल्हापूर डाक विभागामार्फत टपाल जीवन विमा व ग्रामीण जीवन विमाकरिता थेट अभिकर्त्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी 3 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे प्रवर अधीक्षक रुपेश सोनावले यांनी केले आहे.
टपाल जीवन विमाकरिता थेट अभिकर्त्याची नियुक्ती करण्याकरिता पात्रता-
वयोमर्यादा- कमीतकमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 60 वर्षे, मान्यताप्राप्त केंद्रीय, राज्य सरकारच्या बोर्ड, संस्थांमधून 10+2 उत्तीर्ण, आवेदनकर्त्याला विमा क्षेत्राबाबत तसेच विपणन कुशलता असणे आवश्यक, बेरोजगार/ स्वयंरोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार/ कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहाय्यता समूह पदाधिकारी इ. टपाल जीवन विमाकरिता थेट अभिकर्ता पदासाठी आवेदन करू शकतात.
जो उमेदवार थेट अभिकर्ताकरिता निवडला जाईल त्याला टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन/ प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. थेट मुलाखतीव्दारे टपाल विमा/ ग्रामीण टपाल जीवन विमाचे उमेदवार नियुक्त केले जातील. नियुक्त उमेदवारांना आंतरिक प्रशिक्षण देण्यात येईल. नियुक्त उमेदवारांना परवाना परीक्षेसाठी हजर रहावे लागेल आणि परवाना परीक्षा व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच परवाना देण्यात येईल.
नियुक्त उमेदवारांना परवाना देण्याकरिता 250 रू. आणि परवाना परीक्षेसाठी 400 रू. फी म्हणून जमा करावे लागतील. निवड झालेल्या थेट अभिकर्त्याला 5 हजार टपाल बचत बँक खात्यामध्ये अथवा राष्ट्रीय बचत पत्र / किसान विकास पत्रमध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे तारण म्हणून ठेवावे लागतील. थेट अभिकर्ता म्हणून काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर या पत्तयावर 3 सप्टेंबर पूर्वी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्ताऐजवजाच्या सत्यप्रती सोबत पाठवावे, असेही पोस्ट विभागामार्फत कळविण्यात आले आहे.