ज्येष्ठ पत्रकार श्री सुधाकर काशीद यांच्या लेखणीतून
कोल्हापूर :
श्री
स.न.वि.वि.
चि. बबडे
तुझे पत्र काल मिळाले. तू म्हणाली होतीस, बाबा. आठवड्याला पत्र लिहिणार म्हणजे लिहिणार. म्हणून सोमवारपासन पत्राची वाट बघत होतो. चावडी जवळ जाऊन पोस्टमनला दोनदा विचारूनबी बघितलं. काल दुपारी नुकतच जेवून आडवा झालतो तोवर तुझं पत्र आलं. चौकटीत उभं राहूनच ते वाचून काढलं. आईला, आजीला वाचून दाखीवल. आजी कान देऊन ऐकत होती. तू तिकडे शेतात जायला लागलीस हे ऐकून बरं वाटलं.
श्यान… घाण असलं काही म्हणायचं नाही. सगळी कामं करायची. नवरा, सासु, दिराला अजिबात दुखवायचं नाही. हिकडे आपल्या दारात जशी ठिपक्याची रांगोळी काढत होतीस तशीच तिकडेबी रोज काढायची. तू इकडं सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत लोळत पडत होतीस. आता तिकडे तसं चालणार नाही. लवकर उठायचं. चार दिवस जरा त्रास हुईल, पण दहा-बारा दिवसात बाळ तुझ्या अंगाला सवय हुईल .आम्ही सगळे खुशाल हाय. पाचगावची आत्ती काल आलती. तीची धाकटी सुन गरोदर हाय. मी काल डॉक्टरकडे गेलो होतो. तो म्हणाला, रक्त तपासून घ्या. दुधाचं पुढच्या आठवड्यात बिल आल की तपासून घेतो. तू हिकडची काळजी करू नको. तुझा निळा ड्रेस कपाटात बघितला की, बबडे तुझी लई आठवण येते. तुझ्याकडे याव वाटतय. पण बाळका आज्जी म्हणाली, बापानं पोरीच्या घराकड सारख सारख जायचं नसतय. म्हणून मी आता लगेच येत नाही. गणपतीला मी तुला न्यायला येतो. पण अजून चार महिने ते लांब हाय. बाकी इकड सगळ ठिक . आई, आजी, पिंट्या व्यवस्थित हाय. पत्र आठवड्याला पाठव, वाट बघतो.