राज्यात शासकीय कार्यालयात फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला होणार सुरुवात
मुंबई :
“हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील,” अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी ही घोषणा केली.
या निर्णयाची घोषणा करताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगान आहे. हा केवळ एक शब्द नसून भारतीयांच्या भारतमातेविषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. १८७५ मध्ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्याकाळात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचं काम करत होते. ‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्यक्त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्तीचे स्फुल्लींग चेतविले.”
“भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्या या रचनेतील एकेक शब्द उच्चारताच देशभक्तीची भावना जागृत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्द त्यागत त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापुढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरू करणार आहोत. १८०० साली टेलिफोन अस्तित्वात आल्यापासून आपण हॅलो या शब्दाने संभाषण सुरू करतोय,” असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
सांस्कृतिक कार्यविभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, असही नमूद केलं.