फोटो प्रातिनिधिक
मुंबई :
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत १९६ शिक्षण संस्थांमधील जागांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना स्व प्रमाणपत्र नव्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांचा या पदभरतीसाठी विचार केला जाणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाकडून पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया रखडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय आणि खासगी अनुदानित संस्थांमध्ये मुलाखतीसह अशा दोन टप्प्यांत भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या ५६१ व्यवस्थापनांच्या २ हजार ६२ रिक्त जागांसाठी संकेतस्थळामार्फत गेल्यावर्षी पात्र उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात आली. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांच्या जाहिरातीमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी जागा होत्या, पण खुल्या प्रवर्गासाठी जागा नाहीत अशा १९६ शाळांच्या व्यवस्थापनांसाठी नव्याने प्राधान्यक्रम घेऊन पदभरतीची प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
काही उमेदवारांकडून गैरसमजुतीने किंवा चुकीने संकेतस्थळावर स्व प्रमाणपत्रात चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरलेली असल्याने आणि या माहितीमध्ये बदल करण्याबाबत उमेदवारांकडून गेल्या दोन वर्षांपासून विनंती करण्यात येत असल्याने, संबंधित उमेदवारांना स्व प्रमाणपत्रात बदल करण्याची सुविधा २४ सप्टेंबर २०२१ पासून देण्यात आली होती. मात्र उमेदवारांचे स्व प्रमाणपत्र अद्ययावत झालेले नाहीत. त्यामुळे आता २०१७ मध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी झालेल्या, संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या सर्वच उमेदवारांना प्रमाणपत्रात बदल करण्यासाठी १७ जुलैची मुदत देण्यात आली आहे.
ही मुदत संपल्यावर १९६ व्यवस्थापनांतील रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम घेऊन गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल, शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. अधिक माहिती https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.