अपडेट : राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग
दुपारी 4 वाजेपर्यंत 29 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर ला 8 जुलै पर्यंत रेड अलर्ट व 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी
कोल्हापूर :
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 87.76 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील एकूण 29 बंधारे पाण्याखाली आहेत. घटप्रभा मध्यम प्रकल्प आज दुपारी 1 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, पेंडाखळे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- मांडूकली, शेणवडे, कळे व वेतवडे, धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर असे 29 बंधारे पाण्याखाली आहेत.
भारतीय हवामान वेधशाळेच्या अंदाजानुसार
नागरिकांना सावधानतेचा इशारा
भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार 9 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: 8 जुलै पर्यंत रेड अलर्ट व 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात याच पध्दतीने पाऊस सुरु राहिला तर पंचगंगा, दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या सर्व नद्या सद्य: स्थितीत इशारा पातळीपर्यंत दि. 7 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
वेधशाळेने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ संभवत असून पाणी पातळीमध्ये 5 ते 6 फुटांची वाढ होऊन दिनांक 7 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत किंवा आधी पाणी पातळी धोका पातळीस पोहचण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी या इशाऱ्यानुसार सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणानी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भू:स्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरिकांनी आवश्यकती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येत आहे.