संघर्षशील नेतृत्व हरपले :
शेतकरी कामगार चळवळींचे अग्रणी ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन
कोल्हापूर :
शेतकरी कामगार चळवळींचे अग्रणी ज्येष्ठ नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्राध्यापक एन.डी. पाटील यांचे आज(१७ जानेवारी) कोल्हापुरात खासगी रुग्णालयात वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. उद्या (१८ जानेवारी) कोल्हापुरमधील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या (कदमवाडी रोड, सदरबाजार ) मैदानावर सकाळी ८ ते २ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. करोनाच्या नियमांमुळे अंत्ययात्रा निघणार नाही.
प्राध्यापक एन.डी.पाटील समाजवादी प्रबोधिनीचे व अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन व विवेकवादी चळवळीचे अग्रणी असल्याने कोणत्याही कर्मकांडाशिवाय त्यांचा अंत्यविधी होणार आहे. करोनाच्या नियमांमुळे केवळ २० जणांच्या अर्थात कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यविधी होणार आहे. तरी कार्यकर्त्यांनी शाहू कॉलेजवर अंत्यदर्शनासाठी यावे मात्र अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी करू नये तसेच मास्क, फिजिकल डिस्टनसिंग आणि महाविद्यालय परिसरात पार्किंग नियमांचे पालन करावे, असे आवाहन एन.डी. पाटील यांच्या पत्नी सरोजताई उर्फ माई पाटील व कुटुंबियांनी केले आहे.
अध्यापन कार्य….
१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य
प्रा. एन.डी. पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य
शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून
राजकीय कार्य
१९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
१९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस
१९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
१९८५-१९९०– महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते
मिळालेले सन्मान / पुरस्कार
भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य
प्रसिद्ध झालेले लेखन
समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३
वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६
महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )
रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य
चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.
उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं – अजित पवार
“महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड – सतेज पाटील
शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे कैवारी, पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील सर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास व आम्हा तरुणांचे मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले. ” , अशा भावना राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त करून प्रा. एन डी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.