संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी
संपूर्ण लसीकरण बंधनकारक
जिल्हाधिकारी राहूल रेखावार
कोल्हापूर :
कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत असल्याने संसर्गाचा धोका वाढणार आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी संपूर्ण लसीकरण बंधनकारक असून प्रत्येक नागरिकांने संपूर्ण लसीकरण करुन घेणे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे याबरोबरच शासन व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटोकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज केले.

कोव्हिड 19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस अतिरीक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
संपूर्ण लसीकरण नाही …..प्रवेश नाही
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कोविड प्रतिबंधासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य असून ज्यांनी अद्यापही पहिला डोस घेतला नाही अशा 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी त्वरीत पहिला डोस घ्यावा. तसेच ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनी दुसरा डोस विहीत कालावधीत घ्यावा. मास्क नाही प्रवेश नाही हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आला. आता याच पद्धतीने संपूर्ण लसीकरण नाही प्रवेश नाही हा उपक्रम देखील प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच खासगी आस्थापना, दुकानदार, घाऊक व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक, एमआयडीसी, पेट्रोल पंप, रेशन दुकानदार यांनी त्यांच्या आस्थापनाच्या ठिकाणी ठळक अक्षरात संपूर्ण लसीकरण नाही प्रवेश नाही अशा आशयाचे फलक लावावेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी ज्या व्यक्ती खरेदीसाठी व अन्य कारणांसाठी येतील त्यांच्याकडे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेल्या प्रमाणपत्राची पडताळणीकरुनच त्यांना सेवा द्यावी.
कोव्हिड नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कोरोना ओमायक्रॉन व्हेररियंटची घातकता लक्षात घेता मास्कचा वापर अनिवार्य आहे. ज्या व्यक्ती मास्कचा वापर करणार नाहीत त्यांच्याकडून शासनाने निर्धारित केलेला दंड वसूल केला जाईल. कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था,आस्थापना या दंडास पात्र असतील. कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्या व्यतिरिक्त, अशा संस्थाना किंवा आस्थापनांना सुद्धा रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.
जर कोणतीही संस्था किंचा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादीमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रूपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोबिड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. तसेच सेवा पुरविणारे चाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही मार्गदर्शन केले.
जिल्ह्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबण्यिात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांना सहकार्य केले जाईल, असे बैठकीस उपस्थित असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.