‘न्याय आपल्या दारी’
फिरत्या लोक अदालतीचे उद्घाटन
18 डिसेंबर पर्यंत प्रत्येक तालुक्यांना भेट
कोल्हापूर :
‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेअंतर्गत फिरत्या लोक अदालतीचे उद्घाटन उर्मिला जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार आणि उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशनानुसार घेण्यात आलेली लोक अदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष वृषाली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (सातारा) उर्मिला जोशी यांनी ‘विवाह पूर्व समुपदेशन व दाखल पूर्व प्रकरणांमध्ये पक्षकाराचे समुपदेशन’ या विषयी मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी न्याय आपल्या दारी या संकल्पने अंतर्गत पुढील योजनांची माहिती दिली. बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ॲड. विवेक घाटगे, बार असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष गिरीश खडके, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. विवेक शुक्ला यांनी फिरत्या लोक न्यायालयाबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाबाबत विधी स्वयंसेवक अनिता काळे यांनी माहिती दिली. फिरते लोकन्यायालयामध्ये प्रलंबित 4 फौजदारी प्रकरणे व शहर वाहतूक नियंत्रण शाखेची 72 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये एकूण 14 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला. फिरती लोकअदालत 11 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये भेट देणार आहे. या फिरत्या लोकअदालत मध्ये जास्तीत जास्त प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन जिल्हा व विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी केले.
यावेळी श्रीमती जोशी यांनी न्यायिक अधिकाऱ्यांना चांगल्या न्यायव्यवस्थेसाठी टीम म्हणून काम करण्याचे आवाहन केले. ॲड. घाटगे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी बार व अससोयेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अशोक पाटील यांनी आभार मानले.