योजना : आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना
कोल्हापूर :
केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी जसे शेतकरी उत्पादक गट/संस्था/ कंपनी/स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी संस्था यांना लाभ देय आहे. ही योजना एक जिल्हा एक उत्पादन यावर आधारीत असून कोल्हापूर जिल्ह्याकरिता ऊस उत्पादन निवडण्यात आलेले आहे. योजनेतून शेतीमालाचे मूल्यवर्धन, पुरवठा साखळीशी जोडणी व त्याव्दारे संबंधितांचे जीवनमान उंचावले जाणार आहे.
योजना बँक कर्जाशी निगडीत असून वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के व कमाल 10 लाख मर्यादेत व गट लाभार्थ्यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के अनुदान देय आहे. तसेच मार्केटिंग व ब्रँडींगकरिता गट लाभार्थ्यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय आहे.
आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेंतर्गत शेतकरी उद्योजकांनी https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची असून अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी/उपविभागीय कृषी अधिकारी या कार्यालयांशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.