आम्ही पूरग्रस्तांसाठी किरकोळ मदत मागत आहोत : आमच्या मागण्या तातडीने मान्य करा आणि शेतकऱ्यांना मदत करा ,अन्यथा हजारो कार्यकर्ते पंचगंगा नदीत बुडून जीव देतील
राजू शेट्टी यांचा इशारा
कोल्हापूर :
सरकारकडे आम्ही पूरग्रस्तांसाठी किरकोळ मदत मागत आहोत, सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, मग मंत्र्यांची दालने सजवायला, नवीन गाड्या घ्यायला, साखर कारखान्यांना बँक हमी द्यायला कुठून पैसे येतात ? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.
पूरग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चिखली येथून पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केली.
यावेळी राजू शेट्टी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले, ‘सरकारच्या घोषणावर आमचा विश्वास नाही. महापुरामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. त्याला आता सरकारच्या मदतीची गरज आहे. सव्वा महिना झाला तरी अजूनही मदत मिळाली नाही. आम्हाला संयम बाळगा अशी विनंती मंत्री महोदय करत आहेत. पण आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, आम्हाला संयम बाळगा म्हणण्याऐवजी आमच्या मागण्या तातडीने मान्य करा आणि शेतकऱ्यांना मदत करा,’ असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले.
पाच दिवस चालणाऱ्या या परिक्रमामध्ये मी वाहनाला स्पर्शही करणार नाही. माझ्याबरोबर सर्वांनी पाच दिवस पंचगंगा नदीच्या काठावरून चालत जायचे आहे. पाच दिवसात सरकारने ठोस निर्णय जाहीर केला नाही, तर पाच सप्टेंबर रोजी हजारो कार्यकर्ते पंचगंगा नदीत बुडून जीव देतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.