राज्यातील भू-विकास बँकेतील ३३ हजार थकबाकीदार कर्जदारांची ३४८ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे निर्देश : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई :
राज्यातील भू-विकास बँकेतील ३३ हजार थकबाकीदार कर्जदारांची ३४८ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. या निर्णयामुळे कोल्हापुरात फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.
भू-विकास बँका बंद करुन बँकेच्या मालमत्ता विकून तसेच कर्ज वसुली करुन कर्मचारी, अधिकारी यांची देणी देण्याबाबतचा निर्णय २०१५ ला घेण्यात आला होता. मात्र कार्यवाही झाली नाही. बँकेकडे कर्ज घेतलेल्या शेतकरी, सहकारी पाणी-पुरवठा संस्था यांचेही कर्ज माफ करण्याची मागणी करून मागील सरकारमध्ये अनेकदा सभागृहाचे कामकाजाही बंद पाडण्यात आले होते.
आज भू-विकास बँकेतील अधिकारी, कर्मचारी व थकबाकीदार शेतकरी यांचे कर्ज माफ करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. आमदार आबिटकर यांनी भू-विकास बँकेतील थकबाकीदार कर्जदार गेली २५ वर्षे बँकेच्या कर्जाच्या बोजामुळे हालाखीचे जीवन जगत आहेत. त्यांना नवीन कर्ज उपलब्ध् होत नाही. वसुलीच्या नोटीसांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी केली. कर्जदार शेतकऱ्यांची रक्कम माफ करण्याचा सविस्तर प्रस्ताव सहकार विभागाने त्वरीत सादर करावा, त्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात येईल,असे ते म्हणाले .माजी खासदार आनंदराव आडसुळ यांनी भू-विकास बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांची देणी देण्याकरीता सरकारने निर्णय घ्यावा,अशी मागणी केली.