कोल्हापूर :

दऱ्याखोऱ्यात, डोंगर कपारीत करवंदे,आंबे,फणस शोधायचे आणि येना जाणाऱ्या वाहनचालकांना विनवणी करून ते विकायचे आणि त्या पैशावर घरचा गाडा चालवायचा, घाटमाथ्यावर असा दिनक्रम धनगर वाड्यावरील महिलांचा सुरू असतो. सध्या सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे अशा महिलांचा, वाड्या-वस्त्या वरील कुटुंबांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची संवेदना पोलीस खात्याने जाणली असून कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीने जिल्ह्यात अशा जनतेच्या मदतीसाठी ‘मिशन संवेदना’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था यांच्याकडून धान्य स्वरूपात मदत घेऊन गरजू व्यक्तींना वाटण्यात येत आहे.
यातून गगनबावडा पोलीस ठाणे अंतर्गत बावेली पैकी धनगरवाडा, जर्गी पैकी धनगरवाडा व शेळोशी पैकी धनगरवाडा येथील लोक रानमेवा विकून गुजरान करतात, पोट भरतात. या लोकांना सर्व व्यवहार बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ‘मिशन संवेदना’ अंतर्गत जमा झालेले धान्य गगनबावडा सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने ३५ कुटुंबांना तांदूळ गहू डाळी अशा स्वरुपात धान्य वाटप केले.
यावेळी धनगरवाडा येथील नागरिकांनी, महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
तसेच गगनबावडा तालुक्यातील असळज,वेसरफ, येथील रस्त्याची कामे, इमारत बांधकाम, तसेच विहीर खणणे इत्यादी कामे करणाऱ्या परराज्यातील आलेल्या पंधरा कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. तिसंगी, किरवे, निवडे ,वेसर्डे, येथील पस्तीस गरजू कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. असे एकूण सुमारे शंभर कुटुंबाला धान्य वाटप करण्यात आले आहे. यापुढील काळात सामाजिक बांधिलकी म्हणून संकटाच्या काळात गरजू कुटुंबाला धान्य व आरोग्य विषयी लागणारे साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
यावेळी पोलीस खात्याचे अमर चव्हाण, संदीप घाडगे, युवराज बोबडे, प्रवीण पाटील, पोलीस पाटील प्रशांत पाटील, बाजीराव पाटील, उपस्थित होते ….